भारताने निर्बंध लादल्यानंतर बांगलादेशाची नरमाईची भूमिका   

नवी दिल्ली :  बांगलादेशातून येणारे तयार कपडे आणि अन्नपदार्थांच्या आयातीवर भारताने निर्बंध लादल्यानंतर बांगलादेशच्या हंगामी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे.  व्यापार निर्बंधांबद्दल भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचा दावा बांगलादेशच्या हंगामी सरकारचे सल्लागार शेख बशीरुद्दीन यांनी केला आहे. जर काही समस्या उद्भवल्या तर दोन्ही देश चर्चा करून मार्ग काढू असेही बशीरूद्दीन यांनी म्हटले आहे. 
 
भारताने बांगलादेशातून रस्ते मार्गाने येणारे तयार कपडे, फळे, थंड पेये, स्नॅक्स, चिप्स, मिठाई, कापूस आणि कापसाच्या धाग्याच्या वस्तू, प्लास्टिक आणि पीव्हीसी वस्तू तसेच लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली आहे. याआधी बांगलादेशने भारतातून सूत आयात करण्यावर बंदी घातली होती. भारताच्या या निर्णयामुळे बांगलादेशच्या कापड व्यवसायासह अन्य व्यवसाय  अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  
 
दरम्यान, भारताच्या निर्बंधानंतर बशीरूद्दीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, व्यापार निर्बंधांबद्दल भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. अधिकृतपणे माहिती मिळाल्यानंतर आम्ही यावर योग्य ती कार्यवाही करू. तसेच जर काही समस्या उद्भवल्या तर दोन्ही देश चर्चेतून मार्ग काढू.बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख महम्मद युनूस यांनी काही दिवसांपूर्वी चीनला भेट देत भारताविरोधी गरळ ओकली होती. भारताविरोधी आगळीक बांगलादेशला चांगलीच महागात पडली आहे.

Related Articles